Swami Mantra : घराघरातल्या भिंतींवर सुविचार, तसबिरी, प्रेरक विचार लावलेले असतात. का? तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून! परंतु, आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात. मात्र, कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावे, त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो, जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो. पैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे-

कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका,मोठ्याने बोलू नका,मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा, त्रास फक्त तुम्हालाच, मन:शांती सुद्धा तुम्हालाच!विचार ही एक विलक्षणशक्ती असून, (Swami Mantra) तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशिब बदलेल.

हे विचार नित्य आचरणात आणले, तर आपले आयुष्यच बदलून जाईल. आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो. भांडण-तंटे होतात. अपशब्द काढले जातात. वैरभाव निर्माण होतो. रागारागात आपले आणि दुसऱ्याचे मन:स्वाथ्य बिघडते आणि वरचेवर रागावण्याच्या, मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इ. आजारांना शरीरात स्थान मिळते. आमरण गोळ्यांचा ससेमिरा सुरु होतो. अकाली आजार, शस्त्रक्रिया, मृत्यू ओढावतो. हे प्रकरण तिथे थांबत नाही, तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरू राहते.

यासाठीच वरील सुविचारात म्हटले आहे, कोणतेही कारण असो, छोटे किंवा मोठे, रागावू नका. राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते, परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली, तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते. सरावाने राग नियंत्रणात आणता येतो. त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे.

रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो, अपशब्द काढतो, जे ध्यानी-मनीही नसते, तेही बोलून जातो. याचा परिणाम म्हणजे, तो क्षण निसटून जातो, पण शब्द मागे राहतात. यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा. विचार करा. विचार कसला? तर खरेच रागावण्याची गरज आहे का? माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का? (Swami Mantra )

हेही वाचा : घरात अशा प्रकारे जाळा कापूर? जबरदस्त लाभदायक वास्तु उपाय
रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का? आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का? या गोष्टींचा विचार केला, तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे, त्याची तीव्रता कमी होईल. मन शांत होईल. एखादवेळेस तुम्हाला हे जमले, की कायमस्वरूपी तुम्ही स्वत:च्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल. त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही.

हेही वाचा : वृश्चिक रास खरोखर वा’सना प्रिय असते?… बघा तुम्ही सुद्धा असेच आहात का.!!

या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे, ते म्हणजे ` विचार ही एक विलक्षणशक्ती असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशिब बदलेल.’ आपले विचार आपला आचार घडवतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चात्तापाला कारणीभूत ठरते.

म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे. आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील, तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे. आपण जी कृती करतो, त्याला आपले विचार कारणीभूत असतात. म्हणून, आपली परिस्थिती बदलण्याचे सामथ्र्य आपल्या विचारांमध्ये आहे. त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे. आपोआप आपल्या स्वभावात, कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलांबरोबरच नशीबही बदलू लागेल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *